आपल्या बाकावर डकवलेला क्रमांक आणि हॉल तिकिटावर असलेला क्रमांक एकच असल्याची तिनतिन वेळा खात्री करून घेतली होती.बेल झाली आणि जीवघेण्या शांततेत स्कर्टब्लाऊज घातलेल्याआणि बॉबकट केलेल्या सुपरवायजर आल्या. हॉलतिकिट पाहण्याचा कार्यक्रम न बोलताच पार पडला.पुरवणी मागण्यासाठी सुद्धा बोलायचा प्रसंग आला नाही.नुसते उभे राहिले की मॅडम अगोदरच सही करून ठेवलेली पुरवणी देत होत्या.इंग्रजी बोलण्याचे मरण अजून ओढवले नव्हते.माझा पेपर वेळेपूर्वी झाला .मी उभा राहिलो.मॅडणी बाकाजवळ आल्या. मी त्यांना मोठ्या प्रयत्नाने जुळवलेल्या इंग्रजीत म्हटले," I want a rope". त्यांनी टेबलावर ठेवलेला दोरा आणला आणि शुद्ध मराठीत हळू आवाजात म्हणाल्या " याला थ्रेड किंवा स्ट्रिंग म्हणतात."त्यांच्या पेहरावामुळे, त्याहीपेक्षा बॉबकटमुळे त्यांच्याशी इंग्लीशशिवाय कोणत्याही भाषेत बोलणे( अलिकडच्या शब्दात, संवाद साधणे) शक्य नाही असे मला वाटले होते .
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
इंग्लीश
अकरावीच्या शेवटी बोर्डाच्या परीक्षेला माझा नंबर एका कॉन्व्हेंट शाळेत आला.भव्य इमारत आणि त्याहूनही इंग्लीश बोलावे लागणार याची भीती परीक्षेच्या काळजीपेक्षा जास्त भेडसावत होती.आई किंवा वडील मुलाला परीक्षाकेंद्रावर सोडायला येण्याची पद्धत सुरु झाली नव्हती.माझ्या मोठ्या भावाच्या शब्दात, ' रानात झाडे आपोआप वाढतात तशी मुले आपोआप वाढतात 'असा बहुतेक पालकांचा समज होता.आठवीत एबिसिडी शिकायला सुरुवात केलेले, चाळीच्या इमारतीत भरणाऱ्या शाळेत जाणारे आणि कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणारे आम्ही कशा भांबावलेल्या मन:स्थितीत होतो याची कल्पनाच करावी लागेल.
रविवार, १७ एप्रिल, २०२२
प्रार्थना रघुनाथाची
भगवन्नाम्नि रुचिर्नास्ति चित्तं विषयलोलुपम्
तथापि परमार्थेच्छा सिद्धिं नयतु त्वत्कृपा
ईषणात्रयमुक्तं मे मानसं स्यात् कदा गुरो
कदा नामामृतस्वादलोलुपा रसना भवेत्
भुञ्जानस्य तु प्रारब्धं न धैर्यं मम नश्यतु
स्मरणं दिव्यनाम्नस्ते प्रसादयतु मानसम्
शुचीनां श्रीमतां गेहे अन्यस्मिन् जन्मनि प्रभो
तव सेवारतं सफलं आयुर्मे देहि निश्चितम्
श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च सद्गुरुं रघुनाथ त्वाम्
नमामि मनसा भक्त्या भवबन्धनिवारकम्
गुरुवार, १४ एप्रिल, २०२२
अंगुष्ठमात्र चरित्र
पुढारलेल्या देशात ,निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्थेत आणि चांगल्या कुटुंबात मी जन्मलो/ ले असतो/ते तर मी काय केले असते त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला करता येणार नाही !आता मात्र मी या सबबींचे च्युइंगम चघळत कालक्षेप करत आहे !
--- अनेकां/ कींच्या आत्मकथनांचा अंगुष्ठमात्र सारांश .
बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२
माधव मनोहर
माधव मनोहर हे केवळ त्यांच्या मुलांचेच नव्हे तर कितीतरी युवायुवतींसाठी ' पपा' होते.त्यांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे पितृतुल्य होते.खऱ्या अर्थाने ते मराठी साहित्यव्यवहारातील 'बापमाणूस' होते.वाङ्मयचौर्याचा वेध घेऊन कुणाच्या रागलोभाची पर्वा न करता त्या लेखकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे 'फौजदार' होते.त्यांच्या आधीच्या पिढीतील बहुतेक मराठी साहित्यिकांशी प्रत्यक्ष ओळख असल्याने ते एका समृद्ध परंपरेचा आणि नव्या पिढीने सुरु केलेल्या परिवर्तनाच्या हालचालीचा, नव्या प्रवाहांचा दुवा( लिंक) ठरले.जुन्या नव्या सर्वांना हवेसे वाटणारे ,सोबत मधील पंचम , नवशक्तिमधील ' शब्दांची दुनिया ' या सदरांतील त्यांच्या लिखाणामुळे प्रत्यक्ष परिचय नसलेल्यांना ते ' शिष्ट', 'आढ्यतेखोर' वाटत. त्यात पुन्हा त्यांची ' शालप्रांशुः, वृषस्कन्ध:' अशी बलदंड दिसणारी शरीरयष्टी आणि बंगाली पद्धतीने नसलेले धोतर आणि झब्बा हा वेष आणि सिगार ओठात ठेवून आजुबाजुच्या लोकांकडे लक्ष न देत एक प्रकारच्या बेफिकिरपणे चालत जाण्याची त्यांची अशी खास ढब हे सर्व त्यांच्या प्रतिमेत भर टाकणारे बाह्य , फसवे दर्शन .पण प्रत्यक्ष ओळख झाल्यावर मात्र त्यांना सर्व पपा का म्हणतात ते न सांगता कळत असे. वयाने मोठे असले तरी आपल्यापेक्षा कितीही लहान असलेल्या मुलामुलींच्यात ते सहज मिसळत असत.जनरेशन गॅप त्यांना किंवा त्यांच्याशी ओळख झालेल्या कोणालाही कधी जाणवत नसे.
त्यांच्या लिखाणात ऐसपैस , रंजक पाल्हाळ असे आणि त्यांच्या विशिष्ट लकबींचि माफक थट्टाही अनंता भावे यांच्या सारख्यांनी केलेली आहे.' मला त्यांच्यासारखे विषयांतराला धरून लिहिता येत नाही' किंवा त्यांच्या मधेच कंसात पक्षी म्हणून लिहिण्याला उद्देशून 'माधवरावांच्या लिखाणात पक्षी उडत असतात ' ही दोन पटकन आठवणारी उदाहरणे.पण वडीलधारे आसपास नाहीत याची खात्री करून घेऊन त्यांची नक्कल करणाऱ्या नातवंडांचा प्रेमळ, लाडिक आविर्भाव त्या थट्टेमागे असे. नावानंतर शिवाजी पार्क रोड नं. तीन एवढ्या पत्त्यावरही ज्यांना नक्की पत्र मिळत असे असे ते व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्या दादरच्या , शिवाजी पार्क परिसराचे एक भूषण होते.
"आपले लेखन अमुक मासिकात आले आहे असे सांगू नये आणि लेखनाचा डिफ़ेन्स ही करु नये.तुम्ही अनुवाद करु नका, स्वतंत्र लिहा "या माधव मनोहर यांच्या सूचना होत्या.त्यांना आपल्या स्वतःबद्द्ल जराही भ्रम नव्हता.आपण निरीक्षणे लिहिता त्याचे फलित काय या माझ्या प्रश्नावर ते लगेच म्हणाले, " काही नाही.जे नाटकच नव्हे असे मी लिहितो त्या नाटकाचे शेकडो प्रयोग होतात आणि मी जे चांगले नाटक म्हणतो ते चालत नाही".हे अगदी सहजतेने , निर्विकारपणे pat came the reply म्हणतात तसे दिलेले उत्तर होते." मी लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यातून पैसे मिळण्याचा प्रश्नच नव्हता .आपले लिखाण छापतात हेच मोठे वाटत असे .आता कोरा चेक देऊन लेखन मागतात ". अश्लील वाटतील अशी पुस्तकेही त्यांच्या बाहेरच्या खोलीत ठेवलेली पाहून मी म्हटले. ' सर, यांना कव्हर वगैरे का घालत नाही?' यावर पुस्तकांची जी छापील कव्हर्स असतात त्यांचे म्हणून एक डिझाईन बनते असे ते म्हणाले .माझ्या प्रश्नाचा रोख स्पष्ट करत मी पुन्हा विचारले . ' तसं नाही.घरातल्याच किंवा बाहेरच्या कोणी हे वाचले तर ?' ते मोठ्याने हसून म्हणाले, ' आधी इंग्लीश म्हटल्यावर बहुतेक जण ते उघडत सुद्धा नाहीत वाचणे राहिले दूरच '. त्यांच्याकडे असलेले आणि वाचून आवडलेले एखादे पुस्तक मी विकत घेतले आणि त्यांना सांगितले की म्हणत ' अरे, मजजवळ आहे की मग ते कशाला घेतलेत?'.मला पुस्तक देतांना ' बघा आवडले तर , नाहीतर द्या सोडून' असे सांगत.वाचन आनंदासाठी करायचे हा त्यांचा कटाक्ष होता.आडवाटेवरचा महाराष्ट्र असे एक पुस्तक आहे तसे ते सहसा इतरांच्या नजरेत आली नसतील अशी पुस्तके ते वाचत.चरित्रआत्मचरित्रे वाचण्यावर त्यांचा भर असे.शेक्सपियर मला समजत नाही आणि त्यामुळे आवडतही नाही असे म्हटल्यावर ते म्हणाले ,' मग अजिबात वाचू नका.' मोराव्हियाचे रोमन टेल्स , गार्सन कॅनिनची पुस्तके, अर्ल विल्सन ची हाॅलिवूड विषयीची पुस्तके त्यांच्यामुळे मी वाचली.
बुधवार, १६ जून, २०२१
रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
आपल्या शिकवण्यात वेगळेपणा ,काहीतरी खास स्वतःचे म्हणून वैशिट्य निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येकशिक्षक करत असतो अशी माझी कल्पना आहे . मी तो कसा केला त्याबाबत हे विवेचन .
मी संस्कृत शिकवत असलो तरी त्यावेळी नेमलेली मराठी , हिंदी आणि इंग्लिश पाठ्यपुस्तके मी पाहत असे ,त्यात काही साम्य आढळते का शोधून त्याचा उल्लेख मी शिकवताना करत असे .मुलांना त्याची गंमत वाटे आणि इतर कोणी शिक्षक हे करत नसल्याने त्यांना ते आवडत असे . त्यावेळी लोकप्रिय असलेल्या मराठी ,हिंदी गाण्यांचा मी एखादा मुद्दा स्पष्ट करताना उपयोग करत असे .संस्कृत श्लोक शिकवताना त्या श्लोकांच्या अन्वयार्थापलीकडे स्वतःचा विचार कसा करायचा ते मी जाणीवपूर्वक कसा करत असे ते खालील नमुन्यांवरून कळेल .
साधा आठव्या इयत्तेच्या पुस्तकातला ' परोपकाराय फलन्ति वृक्षाः ... ' हा श्लोक सर्वाना माहित आहे .पाच मिनिटात शिकवून संपतो . मी ही तसाच तो संपवत असे पण पुढच्या श्लोकाला सुरुवात करण्याच्या आधी मी '
" वृक्ष स्वतःची फळे खाऊ शकतील का ? परोपकारासाठी त्यांना फळे येतात ही कविकल्पना आहे . पाणी सखल भागाकडे वाहत जाते ते त्याच्या नियमाने .नद्या परोपकारासाठी वाहत नाहीत . माणसाने त्या फळांचा , पाण्याचा उपयोग करून घेतला एवढेच खरे . " हे सांगताना सावरकरांच्या ' विश्वाचा देव आणि माणसाचा देव ' या प्रसिद्ध निबंधाचा परिचय मुलांना करून देत असे .विंदा करंदीकर यांच्या एका लघुनिबंधात " कोंबडी ,बोकड हे आपल्याला मटण मिळावे म्हणून निर्माण झाले असा विचार करणे ही माणसाच्या आत्मकेंद्रित विचारसरणीची परिसीमा आहे 'असे म्हटले आहे . काही अंशी याचे वेगळे रूप पु.ल. देशपांडे यांच्या काकाजींच्या तोंडी घातलेल्या संवादात आहे . "आषाढात मेघांचा पखवाज वाजतो तो तुझ्यासाठी .. "इ. त्या श्लोकाचे निमित्त करून मुलांना उत्तमोत्तम साहित्याची ओळख मी करून देत असे . आपल्या वाचनाचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांवर छाप पाडण्याचा नव्या शिक्षकाचा हा प्रयत्न होता असेही म्हणता येईल तो नाकारण्यासारखाही नाही .
' असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम् ' हा असाच श्लोक आहे . त्यावरून मी जावयाला म्हणजे पुरुषाला सासुरवाडीला मान मिळतो वगैरे सांगून एखाद्या लग्न झालेल्या मुलीला सासूसासऱ्याचे हे सारम् वाटेल का अशी सुरुवात करून पुरुषी दृष्टीकोन या श्लोकात आहे , पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेले असे समजून वाचा असे सांगत असे .( ' कन्यादान ' या शब्दात कन्या ही मालकीची वस्तू आहे ही कल्पना कळत नकळत दिसते तसेच हे नाही का? } अशा विवेचनाने फेमिनिझमशी मुलांची ओळख करून देत असे . नि:स्पृहस्य तृणं जगत शिकवताना छबिलदास शाळेतले एक सर " जगाला पण निस्पृह माणसाची किमत नसते " असे सांगत असे मी ऐकले होते . नि:स्पृह असणे चांगले पण त्याचा अहंकार आपल्याला काटेरी तर बनवत नाही ना असा प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारा तो विचार वाटला मला .
संस्कृत जुने ,जुनाट आणि अप्रस्तुत वाटू नये अशा विचाराने मी संस्कृत शिकवले . अक्रोधेन जयेत् क्रोधं हे सहज पटण्यासारखे नाही ,विनोबा भावे यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे 'जशास तसे ' मधुकर' नावाच्या संग्रहातला हा निबंध युक्तिवाद आणि नर्म विनोद या दृष्टीने मुळातून वाचण्यासारखा आहे . त्यात ते म्हणतात तलवारीशी तलवारीने लढावे असा या म्हणीचा अर्थ आपण लावतो कारण तलवार हातातून गेली आहे .आपल्याला लढाईचा प्रत्यक्ष अनुभव नाही .खरोखर लढणाऱ्या माणसाला विचारले तर तो म्हणेल , ' तलवारीशी ढालीने लढतात ' तसेच रागाला प्रेमाने जिंकावे .मी रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचलेल्या एका लेखाचे शीर्षक Love thy enemies and drive them crazy मी मुलांना सांगत असे ,कधीकधी समोरच्या रागावलेल्या माणसाला आपण शांत राहून ,आपण पण चिडू या त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद देऊन जिंकता येते ., गडकऱ्याना एक माणूस चिडून म्हणाला '" मी गाढवाशी बोलत नाही ". त्यावर ते म्हणाले , "पण मी मघाचपासून बोलतोय. "कधीकधी विनोदानेही क्रोधाचा सामना करता येतो . अशी उदाहरणे देऊन शिकवणे रंजक करता येते .
आमचे एक रसायनशास्त्र शिकवणारे सर संप्लवन ( sublimation)शिकवत होते .त्यांनी एखादा हुशार मुलगा पाचवीतून एकदम सातवीत जातो तसेच काही पदार्थ घनरूपातून द्रवरुपाची अवस्था ओलांडून एकदम वायुरूपात जातात त्या स्थित्यंतराला संप्लवन म्हणतात असे व्यवहारातले आम्हाला पटेल ,परिचयाचे वाटेल असे उदाहरण देऊन शिकवले होते .दुसऱ्या एका शिक्षकांनी मराठी आणि इंग्लिश वाक्यरचनेतला फरक कसा समजावून सांगितला ठाऊक आहे ? ते म्हणाले ' " आपल्याकडे घरातले सगळे बाहेर जायला निघाले की बाबा पहिल्याने . मग मुले बाहेर पडतात .आई बिचारी नळ बंद केले का , लाइट्स पंखे बंद केले न हे सर्व पाहून कुलूप लावून शेवटी येते , मराठी वाक्यात तसेच कर्ता प्रथम ,मग कर्म -विशेषणे इ. आणि शेवटी क्रियापद येते . इंग्लिश मध्ये मिस्टर आणि मिसेस जोडीने बाहेर पडतात .त्यांचे वाक्य तसेच असते . कर्त्यानंतर लगेच क्रियापद ". याचेच अनुकरण मी प्रयोग शिकवताना केले .वाक्य म्हणजे एक कुटुंब असते . काही कुटुंबात वडिलांची सत्ता चालते .पितृसत्ताक आणि पेट्रीआर्कलया शब्दांची ओळख करून देत असे ,काही वाक्यात कर्ता महत्त्वाचा त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलते तो कर्तरी प्रयोग ,संस्कृतमध्ये कर्तरि हे कर्तृ शब्दाचे सप्तमीचे रूप आहे म्हणजे सत्ता कर्त्यात राहते . मग पहिल्याने दोनच शब्दाचे वाक्य घ्यायचे राम: खादति मग द्विचन केले तर / राम: लक्ष्मण: च खादत: होईल .बहुवचन केले तर राम: लक्ष्मण: सीता च खादन्ति असे होईल . कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते हा मुद्दा .सर्वच सांगायची गरज नाही .जे शिकवायचे त्याचा माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष साक्षात संबंध फक्त विज्ञान शिकवतानाच जोडता येतो असे नाही तर सर्वच विषय आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत हे.शिकवणे जरा वेगळे आहे असे मुलांना वाटले पाहिजे . काही कल्पना मला शिकताना समजल्या नव्हत्या त्या मुलानाही समजलेल्या नसतील म्हणून मी मुद्दाम त्या अधिक जोर देऊन शिकवत असे , भावे प्रयोगाला भावे का म्हणतात ? भाव म्हणजे क्रियापदाचा अर्थ . वाक्याची अशी रचना की जिथे क्रियाच महत्त्वाची ,इतकी की कर्त्याच्या पुरुष ,वचनाचे काही महत्त्व उरलेले नसते . मया स्थीयते . आवाभ्यां स्थीयते आणि अस्माभिःः स्थीयते . उभे राहण्याची /थांबण्याची क्रिया घडते एवढेच कित्येक शिक्षकांना भावे माहित नव्हते आणि त्यांना कोणी विद्यार्थ्याने विचारले नसल्याने ते माहित नाही हेही माहित नव्हते .
समास आणि संधी यातला नेमका फरक हा असाच एक विषय कोणाला हा फरक नेमका काय असा प्रश्न पडला नाही .संधीमध्ये पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर यांचे ध्वनी जोडले जातात . एकमेकात मिसळतात , समासात दोन पदांच्या अर्थांचा संयोग होतो . सूर्यस्य + उदय = सूर्यस्योदय हा संधी. पण तीच दोन पदे समासात एकत्र येताना पहिल्या पदाचा विभक्ति प्रत्यय गळतो आणि मग संधी होऊन सूर्योदय हा सामासिक शब्द तयार होतो , सूर्य एक तेजोगोल आणि तो वर येणे म्हणजे उदय या दोन अर्थाचा संयोग होतो ,समासाचे प्रकार शिकवताना पहिले पद प्रधान ,जास्त महत्त्वाचे असे ऐकताना ते प्रधान कसे हाही एक कोणी विचारत नसलेला प्रश्न आहे . व्याकरणामध्ये कोणाला, कितपत रस असतो हा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे .
संस्कृतमध्ये समासांची नावे लक्ष देण्यासारखी आहेत . अव्ययीभाव शिकवताना मी मराठीतले तशाच प्रकारचे शब्द प्रथम सांगत असे . भाव किंवा भवन म्हणजे होण्याची क्रिया . बाष्पीभवन ,स्फटिकीभवन हे विज्ञानातले शब्द त्यांच्या इंग्लिश प्रतिशब्दांसह सांगितले की आपले संस्कृत शिक्षक अगदीच काही 'हे'
( बावळट) नाहीत अशी मुलांची खात्री पटते .अव्ययीभाव म्हणजे जो शब्द मुळात अव्यय / अविकारी नाही तो अव्ययाबरोबर जोडल्यामुळे अव्यय बनतो .जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याला विभक्तिप्रत्यय लागून त्याची रूपे होत नाहीत . हे प्रवर्तित चुंबकत्वासारखे ( temporary magnetism) सारखे आहे . दिन शब्द घ्या .सुटा, एकटा आहे तोपर्यंत तो नाम आहे त्याची दिनम् दिने दिनानि ..अशी आठ विभक्तींची चोव्वीस रूपे होतात . पण तो प्रति या अव्ययाशी जोडला आणि प्रतिदिनम् असा समास झाला की तो अव्ययचं होतो .संगतीचा हा परिणाम ! माणसाने निर्माण केलेल्या भाषेतले शब्द देखील माणसासारखे आहेत हा माझा आवडता विचार पुन्हा एकदा सांगायची संधी कधी कधी वर्गाचा मूड पाहून मी घेत असे . पाठ्यपुस्तकात आलेले प्रति हे पहिले पद असलेले शब्द पाहून त्यांची यादी करणे ,त्यातही सोप्याकडून कठिणाकडे अशी रचना करून ते छान फलकलेखन करून शिकवायचे . दिने दिने प्रतिदिनम्. . मग दिवसे दिवसे याचा समास काय ? असा प्रश्न आणि उत्तर प्रतिदिवसम् आल्यावर उत्तर देणाऱ्याचे कौतुक करत असे . प्रत्यहम् हा जरा त्यांना विचार करायला लावणारा शब्द फळ्यावर लिहायचा . दिन ,दिवस यांच्यापेक्षा वेगळा पण त्याच अर्थाचा अहन् हा व्यंजनान्त शब्द आहे . मराठीतले अहोरात्र ,अहर्निश मध्याह्न वगैरे शब्द यापासूनच बनलेले आहेत .असे सांगत त्याचा विग्रह अहनि अहनि सांगायचा ,फळ्यावर लिहायचा , म्हणून घ्यायचा . परत मागे जाऊन सगळे पुन्हा म्हणून घ्यायचे . मी निरीक्षण करून पहिले आहे की चांगल्या शिकवण्यात थोडेसे पाल्हाळ ,कंटाळा न येऊ देताकेलेली पुनरुक्ती आणि शिकवणाऱ्या शिक्षकाचा खास त्याचा असा वेगळेपणा हे घटक असतातच .
मी संस्कृत शिकवत असलो तरी त्यावेळी नेमलेली मराठी , हिंदी आणि इंग्लिश पाठ्यपुस्तके मी पाहत असे ,त्यात काही साम्य आढळते का शोधून त्याचा उल्लेख मी शिकवताना करत असे .मुलांना त्याची गंमत वाटे आणि इतर कोणी शिक्षक हे करत नसल्याने त्यांना ते आवडत असे . त्यावेळी लोकप्रिय असलेल्या मराठी ,हिंदी गाण्यांचा मी एखादा मुद्दा स्पष्ट करताना उपयोग करत असे .संस्कृत श्लोक शिकवताना त्या श्लोकांच्या अन्वयार्थापलीकडे स्वतःचा विचार कसा करायचा ते मी जाणीवपूर्वक कसा करत असे ते खालील नमुन्यांवरून कळेल .
साधा आठव्या इयत्तेच्या पुस्तकातला ' परोपकाराय फलन्ति वृक्षाः ... ' हा श्लोक सर्वाना माहित आहे .पाच मिनिटात शिकवून संपतो . मी ही तसाच तो संपवत असे पण पुढच्या श्लोकाला सुरुवात करण्याच्या आधी मी '
" वृक्ष स्वतःची फळे खाऊ शकतील का ? परोपकारासाठी त्यांना फळे येतात ही कविकल्पना आहे . पाणी सखल भागाकडे वाहत जाते ते त्याच्या नियमाने .नद्या परोपकारासाठी वाहत नाहीत . माणसाने त्या फळांचा , पाण्याचा उपयोग करून घेतला एवढेच खरे . " हे सांगताना सावरकरांच्या ' विश्वाचा देव आणि माणसाचा देव ' या प्रसिद्ध निबंधाचा परिचय मुलांना करून देत असे .विंदा करंदीकर यांच्या एका लघुनिबंधात " कोंबडी ,बोकड हे आपल्याला मटण मिळावे म्हणून निर्माण झाले असा विचार करणे ही माणसाच्या आत्मकेंद्रित विचारसरणीची परिसीमा आहे 'असे म्हटले आहे . काही अंशी याचे वेगळे रूप पु.ल. देशपांडे यांच्या काकाजींच्या तोंडी घातलेल्या संवादात आहे . "आषाढात मेघांचा पखवाज वाजतो तो तुझ्यासाठी .. "इ. त्या श्लोकाचे निमित्त करून मुलांना उत्तमोत्तम साहित्याची ओळख मी करून देत असे . आपल्या वाचनाचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांवर छाप पाडण्याचा नव्या शिक्षकाचा हा प्रयत्न होता असेही म्हणता येईल तो नाकारण्यासारखाही नाही .
' असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम् ' हा असाच श्लोक आहे . त्यावरून मी जावयाला म्हणजे पुरुषाला सासुरवाडीला मान मिळतो वगैरे सांगून एखाद्या लग्न झालेल्या मुलीला सासूसासऱ्याचे हे सारम् वाटेल का अशी सुरुवात करून पुरुषी दृष्टीकोन या श्लोकात आहे , पुरुषांनी पुरुषांसाठी लिहिलेले असे समजून वाचा असे सांगत असे .( ' कन्यादान ' या शब्दात कन्या ही मालकीची वस्तू आहे ही कल्पना कळत नकळत दिसते तसेच हे नाही का? } अशा विवेचनाने फेमिनिझमशी मुलांची ओळख करून देत असे . नि:स्पृहस्य तृणं जगत शिकवताना छबिलदास शाळेतले एक सर " जगाला पण निस्पृह माणसाची किमत नसते " असे सांगत असे मी ऐकले होते . नि:स्पृह असणे चांगले पण त्याचा अहंकार आपल्याला काटेरी तर बनवत नाही ना असा प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारा तो विचार वाटला मला .
संस्कृत जुने ,जुनाट आणि अप्रस्तुत वाटू नये अशा विचाराने मी संस्कृत शिकवले . अक्रोधेन जयेत् क्रोधं हे सहज पटण्यासारखे नाही ,विनोबा भावे यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे 'जशास तसे ' मधुकर' नावाच्या संग्रहातला हा निबंध युक्तिवाद आणि नर्म विनोद या दृष्टीने मुळातून वाचण्यासारखा आहे . त्यात ते म्हणतात तलवारीशी तलवारीने लढावे असा या म्हणीचा अर्थ आपण लावतो कारण तलवार हातातून गेली आहे .आपल्याला लढाईचा प्रत्यक्ष अनुभव नाही .खरोखर लढणाऱ्या माणसाला विचारले तर तो म्हणेल , ' तलवारीशी ढालीने लढतात ' तसेच रागाला प्रेमाने जिंकावे .मी रीडर्स डायजेस्ट मध्ये वाचलेल्या एका लेखाचे शीर्षक Love thy enemies and drive them crazy मी मुलांना सांगत असे ,कधीकधी समोरच्या रागावलेल्या माणसाला आपण शांत राहून ,आपण पण चिडू या त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळा प्रतिसाद देऊन जिंकता येते ., गडकऱ्याना एक माणूस चिडून म्हणाला '" मी गाढवाशी बोलत नाही ". त्यावर ते म्हणाले , "पण मी मघाचपासून बोलतोय. "कधीकधी विनोदानेही क्रोधाचा सामना करता येतो . अशी उदाहरणे देऊन शिकवणे रंजक करता येते .
आमचे एक रसायनशास्त्र शिकवणारे सर संप्लवन ( sublimation)शिकवत होते .त्यांनी एखादा हुशार मुलगा पाचवीतून एकदम सातवीत जातो तसेच काही पदार्थ घनरूपातून द्रवरुपाची अवस्था ओलांडून एकदम वायुरूपात जातात त्या स्थित्यंतराला संप्लवन म्हणतात असे व्यवहारातले आम्हाला पटेल ,परिचयाचे वाटेल असे उदाहरण देऊन शिकवले होते .दुसऱ्या एका शिक्षकांनी मराठी आणि इंग्लिश वाक्यरचनेतला फरक कसा समजावून सांगितला ठाऊक आहे ? ते म्हणाले ' " आपल्याकडे घरातले सगळे बाहेर जायला निघाले की बाबा पहिल्याने . मग मुले बाहेर पडतात .आई बिचारी नळ बंद केले का , लाइट्स पंखे बंद केले न हे सर्व पाहून कुलूप लावून शेवटी येते , मराठी वाक्यात तसेच कर्ता प्रथम ,मग कर्म -विशेषणे इ. आणि शेवटी क्रियापद येते . इंग्लिश मध्ये मिस्टर आणि मिसेस जोडीने बाहेर पडतात .त्यांचे वाक्य तसेच असते . कर्त्यानंतर लगेच क्रियापद ". याचेच अनुकरण मी प्रयोग शिकवताना केले .वाक्य म्हणजे एक कुटुंब असते . काही कुटुंबात वडिलांची सत्ता चालते .पितृसत्ताक आणि पेट्रीआर्कलया शब्दांची ओळख करून देत असे ,काही वाक्यात कर्ता महत्त्वाचा त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलते तो कर्तरी प्रयोग ,संस्कृतमध्ये कर्तरि हे कर्तृ शब्दाचे सप्तमीचे रूप आहे म्हणजे सत्ता कर्त्यात राहते . मग पहिल्याने दोनच शब्दाचे वाक्य घ्यायचे राम: खादति मग द्विचन केले तर / राम: लक्ष्मण: च खादत: होईल .बहुवचन केले तर राम: लक्ष्मण: सीता च खादन्ति असे होईल . कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलते हा मुद्दा .सर्वच सांगायची गरज नाही .जे शिकवायचे त्याचा माणसाच्या जीवनाशी प्रत्यक्ष साक्षात संबंध फक्त विज्ञान शिकवतानाच जोडता येतो असे नाही तर सर्वच विषय आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत हे.शिकवणे जरा वेगळे आहे असे मुलांना वाटले पाहिजे . काही कल्पना मला शिकताना समजल्या नव्हत्या त्या मुलानाही समजलेल्या नसतील म्हणून मी मुद्दाम त्या अधिक जोर देऊन शिकवत असे , भावे प्रयोगाला भावे का म्हणतात ? भाव म्हणजे क्रियापदाचा अर्थ . वाक्याची अशी रचना की जिथे क्रियाच महत्त्वाची ,इतकी की कर्त्याच्या पुरुष ,वचनाचे काही महत्त्व उरलेले नसते . मया स्थीयते . आवाभ्यां स्थीयते आणि अस्माभिःः स्थीयते . उभे राहण्याची /थांबण्याची क्रिया घडते एवढेच कित्येक शिक्षकांना भावे माहित नव्हते आणि त्यांना कोणी विद्यार्थ्याने विचारले नसल्याने ते माहित नाही हेही माहित नव्हते .
समास आणि संधी यातला नेमका फरक हा असाच एक विषय कोणाला हा फरक नेमका काय असा प्रश्न पडला नाही .संधीमध्ये पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर आणि पुढच्या शब्दाचे पहिले अक्षर यांचे ध्वनी जोडले जातात . एकमेकात मिसळतात , समासात दोन पदांच्या अर्थांचा संयोग होतो . सूर्यस्य + उदय = सूर्यस्योदय हा संधी. पण तीच दोन पदे समासात एकत्र येताना पहिल्या पदाचा विभक्ति प्रत्यय गळतो आणि मग संधी होऊन सूर्योदय हा सामासिक शब्द तयार होतो , सूर्य एक तेजोगोल आणि तो वर येणे म्हणजे उदय या दोन अर्थाचा संयोग होतो ,समासाचे प्रकार शिकवताना पहिले पद प्रधान ,जास्त महत्त्वाचे असे ऐकताना ते प्रधान कसे हाही एक कोणी विचारत नसलेला प्रश्न आहे . व्याकरणामध्ये कोणाला, कितपत रस असतो हा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे .
संस्कृतमध्ये समासांची नावे लक्ष देण्यासारखी आहेत . अव्ययीभाव शिकवताना मी मराठीतले तशाच प्रकारचे शब्द प्रथम सांगत असे . भाव किंवा भवन म्हणजे होण्याची क्रिया . बाष्पीभवन ,स्फटिकीभवन हे विज्ञानातले शब्द त्यांच्या इंग्लिश प्रतिशब्दांसह सांगितले की आपले संस्कृत शिक्षक अगदीच काही 'हे'
( बावळट) नाहीत अशी मुलांची खात्री पटते .अव्ययीभाव म्हणजे जो शब्द मुळात अव्यय / अविकारी नाही तो अव्ययाबरोबर जोडल्यामुळे अव्यय बनतो .जोपर्यंत जोडलेला आहे तोपर्यंत त्याला विभक्तिप्रत्यय लागून त्याची रूपे होत नाहीत . हे प्रवर्तित चुंबकत्वासारखे ( temporary magnetism) सारखे आहे . दिन शब्द घ्या .सुटा, एकटा आहे तोपर्यंत तो नाम आहे त्याची दिनम् दिने दिनानि ..अशी आठ विभक्तींची चोव्वीस रूपे होतात . पण तो प्रति या अव्ययाशी जोडला आणि प्रतिदिनम् असा समास झाला की तो अव्ययचं होतो .संगतीचा हा परिणाम ! माणसाने निर्माण केलेल्या भाषेतले शब्द देखील माणसासारखे आहेत हा माझा आवडता विचार पुन्हा एकदा सांगायची संधी कधी कधी वर्गाचा मूड पाहून मी घेत असे . पाठ्यपुस्तकात आलेले प्रति हे पहिले पद असलेले शब्द पाहून त्यांची यादी करणे ,त्यातही सोप्याकडून कठिणाकडे अशी रचना करून ते छान फलकलेखन करून शिकवायचे . दिने दिने प्रतिदिनम्. . मग दिवसे दिवसे याचा समास काय ? असा प्रश्न आणि उत्तर प्रतिदिवसम् आल्यावर उत्तर देणाऱ्याचे कौतुक करत असे . प्रत्यहम् हा जरा त्यांना विचार करायला लावणारा शब्द फळ्यावर लिहायचा . दिन ,दिवस यांच्यापेक्षा वेगळा पण त्याच अर्थाचा अहन् हा व्यंजनान्त शब्द आहे . मराठीतले अहोरात्र ,अहर्निश मध्याह्न वगैरे शब्द यापासूनच बनलेले आहेत .असे सांगत त्याचा विग्रह अहनि अहनि सांगायचा ,फळ्यावर लिहायचा , म्हणून घ्यायचा . परत मागे जाऊन सगळे पुन्हा म्हणून घ्यायचे . मी निरीक्षण करून पहिले आहे की चांगल्या शिकवण्यात थोडेसे पाल्हाळ ,कंटाळा न येऊ देताकेलेली पुनरुक्ती आणि शिकवणाऱ्या शिक्षकाचा खास त्याचा असा वेगळेपणा हे घटक असतातच .
बुधवार, १ जुलै, २०२०
Poetic Titbits
मी उगीच बसतो ट ला ट जुळवीत
कवितेला माझ्या यमकांनी खुणवीत
ठाऊक मला जरी सर्वमान्य जनरीत
ती मुक्तछंद गृही नांदत श्रीमंतीत
×÷÷
पहिली मम कविताआठवते मज अजुनी
मरणाची केली होती आळवणी मी
वाऱ्याची यावी झुळुक शीळ घालीत
हळुवार तसा तू ये मालवण्या मम ज्योत
× ××
लेकरे झोपली निवांत सारे झाले
ओटीवर गप्पा सरल्या दीपहि विझले
शिणलेली गृहिणी मायेच्या पदराने
समईची मालवी ज्योत आठवणीने
तू तसा येऊनि संपव आपुलकीने
हे जीवनगाणे भैरवी आलापीने
×××
तोंडात घालता साखरदाणा एक
गोडवा पसरतो किती बरे निमिषात
मग गोड बोलणे मनापासुनी सांग
ऐकून किती भवताल सुखी होईल !
ऐकून प्रशंसा रोज मधुर शब्दात
मधुमेह कुणाला झाला काय जगात
बोलून गोड नित सुखवी जो लोकांस
तो जनी जनार्दनपूजन करतो खास
×××
ती गेली निघुनी मुक्तछंद उधळीत
मी होतो जेव्हा वृत्त तिचे जुळवीत
***
मी गेल्यावर जग सोडुनिया रम्य
फुलतील कोट्यवधी गुलाब उद्यानात
परि ज्यांना ठाऊक मद्गुणसुमनसुगंध
ते येतिल जेथे चिरनिद्रित मी शांत.
--- मूळ उर्दू ओळींचा इ एम फोरस्टर यांनी आपल्या Passage to India कादंबरीत केलेल्या इंग्रजी अनुवादाचे हे मराठी रूपांतर.
निंदकाचे घर असावे शेजारी
त्याला कधी घरी आणू नये
आणू नये घरी आणले तरीही
शेजघरा त्याला नेऊ नये
नेले शेजघरी तरी अंगसंग
संपला अभंग भुका म्हणे
भुका म्हणे ऐका याचे वर्म कोणा
अनुभवे विना कळेचिना !
--- गजानन गुर्जरपाध्ये सप्टेंबर 2024
कसा जन्मला पहिला बाप
कुणी म्हणाले आपोआप
नव्हता पाया ,जमीन भिंती
आभाळाला होती गळती
आदम होता तिकडे वरती
इव्ह म्हणाली ती बघ धरती
बोअर झाले मी बघ पुरती
फिरून येऊ जरा खालती
पाहून घेऊ फिरती धरती
येथे आले स्वर्ग विसरले
पार्थिव गुणदोषांच्या योगे
मर्त्य मानवां जन्म देऊनि
आईबाबा झाले चुकुनी
---- गजानन गुर्जरपाध्ये
निश्चय केला एकच सारे फोल येथले उद्योग
उपद्व्याप हे व्यर्थ कशाला कुणास त्याचा उपयोग ?
कुणी कुणाची बाजू घेऊन उगाच लिहितो काहितरी
लग्न कुणाचे आणि नाचती उगाच हिजडे किती तरी! 3 Jan 2025
शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०
तू दिलेले गीत माझे
ज्या चाळीत माझे बालपण गेले आणि ज्या शाळेत मॅट्रिकच्या वर्षी(१९६१) मी होतो त्या दोन्ही ठिकाणी व्यवसायमार्गदर्शन हा शब्द कानावरही पडणे शक्य नव्हते मग शिक्षकाच्या पवित्र ,उदात्त वगैरे व्यवसायात 'पड'ण्याचा किडा माझ्या डोक्यात कसा शिरला त्याचे शक्य तेवढे खरे आणि तटस्थ असे हे टिपंण ' स्वान्त:सुखाय ' करत आहे .
शिवाजीपार्क परिसरातल्या लोकवस्तीत सुस्थितीतल्या कुटुंबातली मुले बालमोहन किंवा किंगजॉर्ज (आताचे नाव राजा शिवाजी विद्यालय )येथे जात .. मी म्युनिसिपल शाळेत (त्यावेळी महापालिका शब्द रुळला नव्हता )सातवीपर्यंत शिकून पायोनियर पब्लिक स्कुलमध्ये दाखल झालो . कित्ते भंडारी हॉलच्या शेजारी असलेल्या चाळीत या शाळेच्या वर्गखोल्या होत्या .
आमच्या शाळेत शिक्षकदिन हा विद्यार्थीदिन म्हणून साजरा केला जात असे .त्या दिवशी दहावी व अकरावीचे विद्यार्थी मुख्याध्यापक ,शिक्षक शिपाई बनून शाळेचे कामकाज चालवत असत . मी दहावीत असताना विद्यार्थीदिनात भाग घेण्यासाठी म्हणजे शिक्षक होण्यासाठी नाव दिले त्याचे खरे कारण सांगायलाच हवे कारण त्यातच पुढच्या सगळ्या कहाणीचे बीज नव्हे पण प्रारंभ आहे. विद्यार्थीदिनात भाग घेतलेल्याना त्या दिवशी शाळा सुटल्यावरच्या शिक्षकसभेनंतर 'दत्तात्रेय' चे बटाटेवडे मिळतात हे मी ऐकून होतो . दत्तात्रेय हॉटेल शाळेच्या समोरच होते आणि मोठ्या ,गरगरीत आणि चविष्ट वड्याबद्दल प्रसिद्ध होते . पैसा नजरेला सुद्धा पडायचा नाही त्यामुळे तिथे जाऊन वडे खाणे ही अशक्य कोटीतली गोष्ट होती . तेव्हा या वड्याच्या आमिषाला मी किती सहज आणि तात्काळ बळी पडलो असेन याची कल्पना करा . याशिवाय फुलपॅण्ट घालण्याची संधीही पाहिल्यानेच या निमित्ताने मिळणार होती .माझे वडील म्युनिसिपल शाळेत प्राथमिक शिक्षक होते , सर्वात मोठा भाऊ मुंबईजवळच्या खेड्यात नव्याने निघालेल्या शाळेचा मुख्याध्यापक होता ,त्याची बायकोही त्याच शाळेत शिक्षिका होती . तेव्हा शिक्षकी पेशा रक्तात होता की काय माहित नाही पण घरात होता हे नक्की . त्या विद्यार्थीदिनाला दहावीत मला उत्कृष्ट शिक्षक म्हणून बक्षिस मिळाले आणि माय फेट वॉज सील्ड . घरच्यांच्या शब्दात , " कानात वारे शिरले ". सेवानिवृत्त होऊनही आता जवळजवळ पंधरा वर्षे होऊन गेली अजून ते वारं उतरलेलं नाही.
मी आठवीपासून इंग्लिश शिकणाऱ्या पिढीतील आणि मॅट्रिकला ग्रेस मार्क धरून इंग्लिशमध्ये जेमतेम पस्तीस गुण मिळून उत्तीर्ण झालो .शिकण्याची अजिबात आवड नव्हती .परीक्षेची तर भीतीच वाटत असे. त्यावेळी घराजवळच रुपारेल हे नव्याने सुरु झालेले कॉलेज होते त्यात मला विज्ञानशाखेत अनायासे प्रवेश मिळालेला होता पण मी तो बदलून आर्टस् ला बदलून घेतला कारण मॉर्निंग कॉलेजेस नव्याने सुरु झाली होती त्याचा वेळ सकाळी जेमतेम तीन तास त्यामुळे कॉलेजात जास्त वेळ अडकून पडण्याची भीती नाही असा विचार मी केला.
कॉलेजमध्ये शिकत असताना सारख्या संस्कृत शिक्षक पाहिजेत अशा जाहिराती वाचून मी बी ए ला संस्कृत घेतले .पण मी पदवी घेतली आणि त्याच वर्षी शालेय अभ्यासक्रमातील संस्कृत गेले .संस्कृत पदवीधर मराठी सहज शिकवू शकेल अशी त्यावेळी मुख्याध्यापकांची समजूत होती .त्यांचा हा समज चुकीचा होता पण मला त्यामुळे नोकरी मिळाली .लवकरच माझ्या लक्षात आले की संस्कृतच्या ज्ञानाचा तेवढासा उपयोग रोजच्या मराठी अध्यापनात होत नाही. त्यावेळी मराठी शिकवणारे जे अनुभवी आणि यशस्वी शिक्षक माझ्या आसपास होते त्यांच्याकडून मी खूप शिकलो.त्यांचा मोठेपणा हा की त्यानी हातचे काही न राखता त्यानी मला शिकवले .
संस्कृत सारखेच पुढे मराठीचे झाले . मला मराठी अध्यापनात थोडीफार समज आणि गती येऊ लागली तेव्हा मी कोचिंग क्लासला पूर्णवेळ शिक्षक होतो . त्या दरम्यान नवगणित (मॉडर्न मॅथेमॅटिक्स ) आले . पालक आणि शिक्षक याना एवढे टेन्शन आले कीं कोचिंग क्लासच्या वेळापत्रकात गणिताला जास्त तासिका देण्यासाठी मराठीला अर्धचन्द्र म्हणजे डच्चू मिळाला . कमी पगाराची असली तरी जास्त शाश्वती असलेली शाळेची नोकरी सोडल्याचा त्यावेळी पश्चात्ताप झाला की नाही आता आठवतही नाही . कष्टाची बरी भाजीभाकरी अशी सरकारमान्य शाळेतली चाकरी कोचिंगक्लसच्या तूपसाखरेपेक्षा बरी हे साधे शहाणपण शिकायला या स्वतःला यशस्वी शिक्षक समजणाऱ्या शिक्षकाला बरीच वर्षे टक्केटोणपे खावे लागले , एकूण काय व्यवहारातले शहाणपण शिकणे कठीण आणि तुलनेने शाळेतले विषय शिकवणे सोपे असते हेच
खरे !
आता आपद्धर्म म्हणून इंग्लिश शिकवणे भाग पडले .पण पत्रिकेत गुरु चांगला असावा कारण याही प्रसंगी जुन्या जाणत्या शिक्षकांनी मला साथ दिली ,सावरून घेतले आणि 'नदीमुखेनैव समुद्रमाविशत' म्हटलंय तसा मी इंग्लिश शिक्षक म्हणून बऱ्यापैकी नाव मिळवले . याला आणखी एक कारण होते . रुपारेलमध्ये शिकत असताना आम्हाला येवलेकर सर एफ वायला सिव्हिक्स आणि इंटरला इकॉनॉमिक्स शिकवत असत .त्यांनी एकदा मला प्रेमाने सांगितले , " मराठी काय केव्हाही वाचू शकशील तू .पण इंग्लिश मात्र आताच सवय लावून घेतलीस तरच .. ".त्यांचा उपदेश मी किती मानला ? मराठी वाचन बंद केले ., पेपरसुद्धा मराठी न वाचता इंग्लिशच वाचायला लागलो . इंग्लिशचा धाक कमी झाला .तरीपण इंग्लिशच्या तासाला पूर्ण तास इंग्लिशच बोलायचे मला सुरुवातीला बरीच वर्षे जमत नव्हते . इंग्लिश वाचनाची पार्श्वभूमी असल्याने फायदा झाला एवढेच .
शिकवण्याचे विषय बदलत गेले त्या प्रत्येक वेळी जड गेले परंतु " जे जे घडे ते स्वहित ' असे तुकारामांचे वचन मला शेवटी अनुभवाने पटले आहे . शेवटची दहा वर्षे मी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत संस्कृत शिकवले . इंग्लिशमधून संस्कृत शिकवू शकत असल्यानेच मला तिथे नोकरी मिळाली . तिथे कोणालाही मी मराठी माध्यमात शिकलो आहे किंवा मराठी माध्यमातच अनेक वर्षे शिकवले असें असे कधी जाणवले नाही ही गंमतच वाटते .
जरी मी बरीच वर्षे मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्लिश शिकवले आणि सुमारे दहा वर्षे इंग्लिश माध्यमाच्या शाळेत संस्कृत शिकवले तरी मला वर्गाबाहेर अनौपचारिक इंग्लिश संभाषण किंवा ज्याला स्मॉल टॉक म्हणतात ते अजूनही जमत नाही . इंग्लिश सिनेमातले संवाद मला अजिबात समजत नाहीत .पेपरात येणारी इंग्लिश शब्दकोडी सोडवता येत नाहीत , इंग्लिश शब्दांचे शिष्टसंमत उच्चार मी अभ्यासलेले नाहीत या उणीवा राहिल्या पण त्या असूनही इंग्लिश शिक्षक म्हणून बऱ्यापैकी नाव मला मिळाले . इंग्लिश वाचन हा माझा हुकुमी विरंगुळा आणि एकमेव 'प्लस पॉईंट ' बनला. संस्कृत मी आवडीने शिकलो.लहानपणी नको इतकी कीर्तनप्रवचने ऐकल्याने नकळत आणि सहज कितीतरी श्लोक ,सुभाषिते सारखी कानावर पडून त्यांचे नादमाधुर्य आणि अर्थसौंदर्य मनावर ठसले . ती विनासायास आणि अर्थासह कायमची लक्षात राहिली . माझ्या वडिलांनी मला पूजा वगैरे शिकवली तेव्हा प्रत्येक पौराणिक मंत्राचा अर्थ सांगितला होता . आई जेमतेम मराठी चौथीपर्यंत गेली असेल पण तिचे वडील आणि काका संस्कृतचे जाणकार होते त्यामुळे तिच्या बोलण्यात ' अतिपरिचयादवज्ञा ' सारखी म्हणीवजा वापरली जाणारी संस्कृत वचने सहज येत . माझ्या वडिलांचे परिचित हर्डीकरशास्त्री म्हणून होते त्यांच्याकडे मी रघुवंशाचा दुसरा सर्ग म्हटला ( शिकलो याचा हा पर्यायी शब्द सर्वश्रुत होता ) . प्रत्येक श्लोक अन्वय लावून शिकवताना त्या अनुषंगाने त्यांनी जे आणि जेवढे व्याकरण शिकवले तेवढी शिदोरी शेवटपर्यंत पुरली . पण मी पाणिनी शिकलो नाही त्यामुळे संस्कृतचे ज्ञान ' पल्ल्वग्राही 'च राहिले .तीनही भाषा शिकवायला भाग पडल्यामुळे इतर संस्कृत शिक्षकांच्या शिकवण्यापेक्षा माझे शिकवणे आपोआपच वेगळे झाले . त्या भाषांच्या पाठयपुस्तकातल्या साम्यस्थळांकडे माझे लक्ष गेले आणि त्याचा शिकवण्यात उल्लेख होऊ लागल्यावर मुलांना आश्चर्य वाटले . वादळ झाल्यावर आडवे पडलेले झाड पाहून एखाद्या ऋषीला उन्मूलयति शब्द सुचला आणि तिकडे युरोपात तसेच दृश्य पाहून अपरुट (uproot ) सुचला असेल असे ऐकल्यावर मानवी मन आणि त्याचे परिस्थितीला प्रतिसाद समान असतात हे वेगळे सांगायची गरज नाही . वेगवेगळे विषय म्हणजे अवतीभोवती पसरलेल्या जगाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत, त्यात एकात्मता आहे . त्यांचे एकमेकांशी नाते आहे ही कल्पना नवीन नाही पण मुलांना ती तशी वाटे . पृथ्वी सूर्याभोवती फिरते,तिच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याने दिवसरात्र होतात हा भूगोलातील धडा आणि पृथ्वीचे प्रेमगीत हो कविता ते त्याचे मोठे आणि ठळक उदाहरण नाही का ? पुण्य पर उपकार पाप ते परपीडा ही अभंगवाणी'परोपकार:पुण्याय पापाय परपीडनम् ' या व्यसनी सांगितलेल्या अठरा पुराणांच्या
सारांशापेक्षा वेगळी नाही . याहीपेक्षा त्यावेळी लोकप्रिय असलेल्या पाडगावकरांच्या गाण्यातील ओळ ' पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले ' आणि इंग्लिश पाठ्यपुस्तकातली वर्ड्सवर्थची 'ग्रीन फिल्ड स्लीप्स इन द सन ' यांची तुलना करून सांगितली की दोन्ही जीवनपद्धतीतला फरक आणि वेगळेपण लक्षात येते . माहेर ,सासर ,हिरवी साडी ,हळद ,माहेरवाशिण हे सगळे संदर्भ ( हळू हळू इथेही कोणाला कळेनासे होत चालले आहेत ) आणि क्वचितच सूर्यदर्शन होणाऱ्या युरोपमधील देशातली सूर्यस्नानाची चाल हे सर्व किती वेगळे आहे ! .संस्कृतचा शिक्षक मराठी हिन्दी चित्रपटातली गाणी आणि इंग्लिश कवितेच्या ओळी उद्धृत करतो हे मुलांनाही नवीन होते . केवळ दोन पिढ्यातले अंतर नाहीसे होऊन शिक्षणात रस निर्माण होण्यासाठी हे मी करत होतों असे म्हणता येणार नाही . बरोबरच्या शिक्षकांपेक्षा आपण वेगळे आहोत असे दाखवून विद्यार्थीप्रियता मिळवण्याची ' चमकोगिरी ' देखील त्यामागे असेल , नव्हे होतीच . सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न म्हणून त्याची संभावनाहि मला सहन करावी लागली .
त्या त्या वेळी मी जे इंग्लिश किंवा मराठी वाचत असे आणि मला विशेष आवडले असेल ते माझ्या शिकवण्यात येत असे . इन स्पाईट ऑफ शिकवताना मी इतरांप्रमाणे दो ,बट पासून सुरुवात करून जेव्हा इन स्पाईट ऑफ हिज बेस्ट क्वालिफिकेशन्स ,ही कुडन्ट गेट या जॉब सांगितले आणि त्यानंतर आपोआप टु सर विथ लव्ह या ब्रेथव्हाईट या आत्मकथनपर पुस्तकाची गोष्टही सांगितल्याचे मला आठवते . शाळेच्या वेळाव्यतिरिक्त जे जे मी केले त्याचे उपयोजन शेवटी वर्गात होत असे . विषयांतर जरूर होत असे पण अभ्यासक्रम ठराविक मुदतीत पूर्ण केला नाही असे कधी मी होऊ दिले नाही त्याअर्थी ते प्रमाणात केले जात होते हे निश्चित . वाचनाचा आणखी एक भाग इथेच सांगायला हवा . साहित्यात कितीतरी चांगल्या शिक्षकांची अतिशय प्रत्ययकारी चित्रणे आहेत .गुडबाय मिस्टर चिप्स व टु यू सर चिप्स हि जेम्स हिल्टनची दोन पुस्तके , वर उल्लेख केलेले 'टु सर विथ लव्ह ,'लुई ऑचिन्क्लोस याचे ' रेक्टर ऑफ जस्टिन ' ही मला मार्गदर्शक वाटली . मराठीत श्री ना पेंडसे यांची 'हद्दपार ' , व्यंकटेश माडगूळकर यांची ' बनगरवाडी ' या कादंबऱ्या किंवा सविता भावे यांनी लिहिलेले नारळकरांचे " नाना ,एका पिढीचे शिल्पकार ' हे चरित्र ही माझ्या लक्षात राहिलेली पुस्तके आहेत . शिक्षकांच्या उणिवा , मर्यादा यांचे उपहासपूर्ण चित्रणही वाचणे शिक्षकाला मार्गदर्शकच ठरते . ' बिगरी ते मॅट्रिक ' किंवा म्हैस मधील " इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासाने कोण सांगणार ? मास्तर , दुसरं कोण ?" हा बोचरा उल्लेख ,बटाट्याच्या चाळीतले कोचरेकर मास्तर ही निगेटिव्ह चित्रणे आपण काय टाळायला हवे हे कळण्यासाठी वाचावीत . कॅचर इन द राय मधील शिक्षकदेखील याच दृष्टीने वाचनीय आहेत .' प्राईम ऑफ जीन ब्रूडी ' ही कादंबरी किंवा त्याच्यावर आधारित चित्रपट या दृष्टीने उल्लेखनीय आहे . रामासारखे वागावे याबरोबरच रावणासारखे वागू नये हेसुद्धा रामायण सांगते तसेच वाचनाचे आहे . शॉ चे दोज हू कॅन ,डू ; दोज हू कॅनॉट ,टीच ' हे तर मी कधीच विसरणार नाही .पुस्तकांची ही यादी संपणार नाही हेच खरे .
ज्यांना शाळाकॉलेजात चांगले शिक्षक लाभतात ते शिक्षक होतात असे एक म्हटले जाते ते अर्धसत्य आहे . कारण तसे झाले असते तर शिक्षक होण्यासाठी उत्सुक पुष्कळ तरुण दिसले असते पण हे मात्र खरे आहे की शिक्षक झाल्यावर आपण मागे वळून पाहतो आणि आपल्याला कोणते शिक्षक कोणत्या कारणांनी आवडले , अजूनदेखील आपल्या मूल्यमापनात तितकेच महत्त्वाचे कोण आहेत याचा आढावा वेळोवेळी प्रत्येकजण घेत असावा , निदान तो घ्यावा हे मात्र निश्चित .तसेच बरोबर काम करणाऱ्या शिक्षकांचे शिकवणे प्रत्यक्ष पाहणे शक्य नसले तरी कॉमनरूम मध्ये कोणाचे बोलणे का ऐकत राहावे असे होते ते पाहणे सहज शक्य आहे . या संदर्भात अपवादात्मक दोन प्रकारची उदाहरणे मला आढळली .गमतीची म्हणून सांगतो . शिक्षकालयात कोट्या करून ,हुकुमी विनोद करून आम्हाला सतत हसत ठेवणारे एक सर वर्गात अतिशय गंभीरपणे शिकवत असत . नव्याने लागलेल्या भूगोलाच्या शिक्षकाला तो नकाशा घेऊन वर्गाकडे निघालेला पाहून जुने शिक्षक हसत म्हणाले , हे बघा नकाशा घेऊन चाललेत वर्गात . आज काय इन्स्पेक्शन वगैरे आहे की काय ? " असे बोलणारे शिक्षक स्वतःमात्र नकाशा घेतल्याशिवाय भूगोलाच्या तासाला वर्गात कधीच जात नसत . अशा वातावरणात नवीन शिक्षकाचा गैरसमज होणे सहज शक्य असते . रूसोच्या वाक्यात फरक करून सांगायचे तर " डू ऍज दे डू अँड नॉट ऍज टे से ", असे सांगावे लागेल .
मी जेव्हा शिक्षक होण्याचे ठरवले तेव्हा वेगवेगळ्या लोकांनी माझ्याशी बोलताना या व्यवसायाबद्दल मला काय काय सांगितले ते मला आठवते . पहिल्याने मी ज्या ठिकाणी पूर्णवेळ शिक्षक म्हणून नोकरी केली तिथल्या मुख्याध्यापकांनी माझी सर्टिफिकेट्स वगैरे न पाहता मला एकच प्रश्न विचारला , " मग काय तुम्ही खड्ड्यात पडायचे ठरवलेच आहे का ? ". ते अत्यंत यशस्वी ,मेहनत घेऊन शिकवणारे शिक्षक होते हे सांगायला हवे . सिनिसिझम हे फसवे बाह्यांग होते पण अंतरंग विद्यार्थ्यांविषयी खऱ्या खुऱ्या कळकळीने ओतप्रोत भरलेले होते . माझे वडील प्राथमिक शिक्षक होते त्यांनी मला म्हटले '" शिक्षक व्हायला हरकत नाही पण फार पैसे मिळणार नाहीत आणि श्रेयही क्वचितच मिळेल ."तेही अतिशय तळमळीने शिकवत असत आणि आपल्यात शिक्षक म्हणून जे काही चांगले आहे ते त्यांच्याकडून आलेले आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे . रुपारेलमध्ये मराठीचे प्राध्यापक असलेले ल. ग. जोग एकदा सहज ओघात म्हणाले , " शिक्षक झाल्याबद्दल एकदाही चुकूनही मला वाईट वाटलेले नाही ". मला स्वतःला काय वाटते ? कवीचे शब्द उसने घेऊन सांगावेसे वाटते : जाहल्या काही चुका अन सूर काही राहिले , तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले . "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)